Saturday, 3 December 2016

Travel Diaries-4 स्वारी उत्तरेची, उत्तरप्रदेश

                  'उत्तरप्रदेश'- हे नाव ऐकलं कि सर्वप्रथम आपल्या नजरेसमोर येतो तो जगातील ७ आश्चर्यापैंकी एक जगप्रसिद्ध असलेला आग्र्याच्या ताजमहाल आणि पेठा. तसे पाहता लहानपणी भूगोलात या राज्याची तोंडओळख ही झालीच होती.लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य म्हणून हे सारे पुस्तकातून अनुभवले होते.परंतु उत्तरेच्या स्वारीचा अनुभव अजून एकदाही आला नव्हता आणि तो योग आला गेल्यावर्षी गणेश उत्सवाच्या कालावधीतच दिनांक १९ सप्टेंबर २०१५ रोजी. उत्तरेकडे झेप घेण्याचा माझा पहिलाच अनुभव होता. उत्तरेचे सांस्कृतिक वैभव प्रथमच अनुभवणार होतो. उत्तर भारतातील कला, संस्कृती, ऐतिहासिक वारसा, लोकांचे राहणीमान हे सारे अनुभवण्याची संधी होती. गणेशचतुर्थी नंतर अगदी दोनचं दिवसात Pune- Patna एक्सप्रेसने पुण्याहून प्रयाण झाले.
                मुक्काम ३ महिन्यासाठी असल्याने सर्व तयारीनिशी निघालो होतो(अर्थात उत्तरेत फार थंडी असते). साधारणतः २४ तासाच्या प्रवासानंतर अलाहाबादला पोहचलो आणि गणेश उत्सवाचा कालावधी असल्याने वातावरण अगदी प्रसन्न होते. आणि तसेच ऑफिसमधे गणपतीची आरती माझ्या हस्ते संपन्न व्हायची तो अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय होता.सप्टेंबर महिन्यात नुकतीच थंडीची चाहूल लागली होती आणि अश्या थंडीत आठवण येते ती म्हणजे वाफाळलेल्या चहाची. चहा सर्व्ह करण्याची नवी पद्धत येथे अनुभवास मिळाली ती म्हणजे मातीच्या कपमध्ये 'चहा serving'. वाफाळलेला चहा आणि गुलाबी थंडी अश्या विविध छबी टिपण्याचा मोह मला आवरता आला नाही. दसरा आणि दिवाळी हे दोन्ही सण माझे इथेच साजरे झाले. दसऱ्याला येथे मोठ्या प्रमाणात रावणदहन व शोभेचे दारुकाम केले जाते. या शोभेच्या दारूकामाने सांगोल्याच्या अंबिकादेवी मंदिराच्या यात्रेतील शोभेच्या दारूकामाची आठवण करून दिली.
                 दसऱ्यानंतर थंडी अगदी जोर पकडू लागली होती. त्यामुळे वाराणसी काशी अगदी ४ तासांच्या अंतरावर असून देखील आम्हाला तेथे जाता आले नाही. परंतु अलाहाबाद येथील गंगा यमुना त्रिवेणी संगम पाहता आला. तसेच उत्तरप्रदेशातील भौगोलिक सांस्कृतिक दृष्टीकोनासोबत खाद्यसंस्कृतीचा पुरेपूर आस्वाद घेतला. साधारणतः डिसेंबर महिन्यात थंडीचा जोर खुप वाढला होता तापमान अगदी ९℃ पर्यंत पोहचले होते. आणि याचवेळी एके दिवशी सकाळी भारताचा राष्ट्रीय पक्षी 'मोर' याचे ही दर्शन झाले. गुलाबी थंडी व धुके यामध्ये हरवलेला निसर्गाच्या विविध छटा टिपण्याचा अनुभव विलक्षण होता.
              अश्या तऱ्हेने साऱ्या आठवणी मनात साठवुन व पुढील यात्रेच्यावेळी वाराणसी काशीला भेट देण्याच्या निश्चयाने दिनांक २२ डिसेंबर २०१५ रोजी अलाहाबादहुन मुंबईसाठी प्रस्थान केले. अश्या तऱ्हेने उत्तरेच्या स्वारीचा पहिलाच अनुभव यशस्वी झाला होता.

No comments:

Post a Comment

आठवणी शाळेच्या..!!!

               लिंबाचे लोणचे मुरले म्हणजे त्याला आंबट गोड रुचि येते! आयुष्यातल्या जुन्या आठवणीही अश्याच.... !!!               शाळेत रोज सक्...