Saturday, 30 December 2017

आठवणी शाळेच्या..!!!

               लिंबाचे लोणचे मुरले म्हणजे त्याला आंबट गोड रुचि येते! आयुष्यातल्या जुन्या आठवणीही अश्याच.... !!!
              शाळेत रोज सक्तीने जाणं,अभ्यास करणं हे फार मजेशीर वाटायचं त्यावेळी. परंतू आता नोकरी, नेहमीची धावपळ यापेक्षा आपल्या शाळेची दंगामस्ती पुन्हा अनुभवता यावं असंच फार वाटू लागलंय आता. ते मैदान..आमचे वर्ग..बाई.. फळा-डस्टर..विशिष्ट चालीत वाजणारी घंटा, शाळा भरल्याची अगर संपल्याची जाणीव करून द्यायची. सकाळच्या स्वच्छ कपड्यांची, संध्याकाळी मातीच्या रंगाशी स्पर्धा चालायची. मोठ्या उत्साहाने सकाळी शाळेत आगमन व्हायचं आणि शाळेत शिकवलेल्या धड्यांचा परिणाम मूडवर होऊन त्याच मूडमध्ये संध्याकाळी घरी यायचो. अशा सगळ्या-सगळ्यांची मनात गर्दी होते आणि पुन्हा शाळेत जावं वाटू लागतं.
               शाळेची एखादी इमारत ही फक्त वास्तू नसते तर संस्कारांचे बाळकडू पाजत पंखांमध्ये बळ देण्याचं काम ती करत असते. अशीच काहीशी आमची उत्कर्ष शाळा..म्हणजेच माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान सांगोला.शालेय शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारी माझी शाळा. 


                 अश्याच माझ्या शाळेच्या गोड आठवणी आहेत. शाळेत होणारे विविध विषयांचे तास आणि ते शिकवणाऱ्या बाई अजूनही स्मरणात आहेत.एखाद्या विषयाच्या बाई मजेशीर असल्या की तास मजेत जायचा, कधी संपायचा ते कळायचंच नाही. तोच एखादा कंटाळवाणा विषय असला की पुस्तकातली व्यक्तिमत्त्वं रंगीत होऊ लागत किंवा मग वहीचं शेवटचं पान भरायला सुरूवात व्हायची. तासाला आपल्याला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही की कसंतरी व्हायचं. बरोबर उत्तर दिलं की हवेतून फेरफटका व्हायचा. विषयाचे तास ठिकठाक असले तरी मज्जा यायची ती चित्रकला आणि कार्यानुभवाच्या तासाला. शिवणकाम काय, कागदाच्या वस्तूच काय बनवायचे...क्रिएटिव्हिटीची शेतीच चालायची. यांच्या बरोबरीने असणारा शा.शि (शारीरिक शिक्षण) म्हणजे पांढरा रंग किती बदलू शकतो याचा प्रत्यय आणून देणाराच. जमवलेले खडूचे, खोडरबराचे, पेन्सिलीचे तुकडे, कागदी रॉकेटस एकमेकांना मारताना जबर मजा यायची. पुस्तकं, कंपासपेट्या इतकंच काय तर अगदी दप्तरं लपवण्याचे प्रकारही बिनदिक्कतपणे सुरू असायचे. शिक्षेची मात्र जबर भीती वाटायची. हातावर आडवी किंवा उभी पट्टी मारणं, वर्गाबाहेर, भिंतीकडे तोंड करून उभं राहणे, शिक्षकांच्या बाजूला खाली जमिनीवर बसणं, ग्राउण्डला फेऱ्या मारणं, माहितीपुस्तकात 'मी असं परत कधी करणार नाही' हे लिहून त्यावर आई-वडिलांची स्वाक्षरी आणणं, एखादा धडाच लिहून आणणं हे प्रकार अनुभवताना काय हालत व्हायची ज्याची त्यालाच ठाऊक.


                    विषय कुठलाही असो, पुस्तकातल्या चित्रांवर चित्रकलेचा तास सुरू व्हायचा.धड्यांमध्ये नको नको ते शब्द घालून किंवा काही अनावश्यक शब्द गाळून विषय नीट समजून घेतला जायचा. शाळेचं भव्य पटांगण, ती घंटा, फळा, खडू, डस्टर, शाळा भरल्यावर (किंवा सुट्टी संपल्यावर) लागणारी रेकॉर्ड , नंतर होणारी प्रार्थना, मौन, ध्वनिक्षेपकावरून सादर केले जाणारे कार्यक्रम, ओळीने होणारे कमी-अधिक कंटाळवाणे तास,तासाला चालणाऱ्या घडामोडी, चिडवाचिडवी, भांडणं, परेड , व्यायामप्रकार, मोठ्याने म्हटलेल्या कविता, पाठ केलेली वृत्तं, श्लोक, सुट्टीतले डबे, हरवलेल्या कंपासपेट्या , वॉटरबॅग्ज, वह्या, पुस्तकं, पेनं, पेन्सिलीचे, खोडरबरांचे तुकडे, रंगवलेल्या भिंती, त्यावर लिहिलेले 'सुविचार', चित्रकलेच्या तासाला काढलेली व्यंगचित्रं, कार्यानुभवाच्या तासात घेतले जाणारे वेगळेच अनुभव, दरवर्षी निघणाऱ्या सहली, वाषिर्कोत्सव , क्रीडामहोत्सव,वक्तृत्वस्पर्धा, नाट्यस्पर्धा, विज्ञान मंडळ, प्रश्नमंजुषा, अपूर्ण गृहपाठ,आपल्या चुकीमुळे दुसऱ्याने भोगलेल्या शिक्षा, होणाऱ्या पालकसभा , केल्या जाणाऱ्या तक्रारी, मॉनिटरबरोबरची भांडणं, अभ्यासाचं, मार्कांचं, परीक्षेचं टेन्शन..परंतु शाळा सुटली आणि हे सारं काही सुटलंच...पण सुटताना त्या चालीत वाजणाऱ्या घंटेच्या टण् टण् मधला शेवटचा टण् मात्र अजूनही कानात घुमतो आहे.

Saturday, 1 April 2017

Darjeeling- एक अनोखा पर्यटनानुभव

पर्यटनाबाबत, प्रवासाबाबत असं म्हटलं जातं की काहीवेळा जिथे पोहोचायचं आहे त्या डेस्टिनेशनपेक्षाही, त्यासाठी केलेला प्रवास अधिक सुंदर, स्मरणीय आणि मनमोहक असतो. असंच काहीसा माझा अनुभव होता तो दार्जिलिंग बाबतीत. चहाचे मळे, घाटमाथा, निसर्ग सौन्दर्य, डोंगर रांगांच्या कुशीत वसलेली छोटी शहरे हे सारे निसर्गाचे वरदान अनुभवत दार्जिलिंगला पोहचणे हा एक स्वप्नवत अनुभव होता.
                                                         Welcome to Darjeeling 
  • दार्जिलिंग विषयी थोडक्यात:                                                                                                               दार्जिलिंग हे उत्तरपूर्व  भारतातील पश्चिम बंगाल मधील एक महत्वाचे थंड हवेचे ठिकाण असून त्यासोबतच येथील दर्जेदार चहा देखील जगप्रसिद्ध आहे. येथील आल्हाददायक वातावरण पर्यटकांना खूप भावते. दार्जिलिंग पासून बागडोगरा हे जवळचे विमानतळ आहे. तर न्यू जलपाईगुडी (NJP) हे जवळचे सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे . या दोन्ही  ठिकाणाहून दार्जिलिंग ला पोहचण्यास ३ तासाचा  अवधी लागतो. दार्जिलिंग शहर हे ब्रिटीशानी इ. स. १८०० च्या सुमारास वसवले आणि आणि काळानुरूप सुगंधित चहा, हिमालयीन रेल्वे यासाठी प्रसिध्द पावले.                                                                                                                                        View of Kanchenjunga 
     
  • पर्यटन विषयक:                                                                                                                                  निसर्ग सौन्दर्याने नटलेल्या दार्जिलिंग हे पर्यटनाची खाण आहे. येथे अगणित पर्यटन स्थळे आहेत जसे कि बर्फाने आच्छादलेला कांचनजंगा (जगप्रसिद्ध माऊंट एव्हरेस्ट येथेच आहे), बौद्ध मंदिरे, ऐतिहासिक चर्च, मंदिरे,  डोंगर रांगांच्या उतारावरील चहाचे मळे, संग्रहालये, कला दालने, बाग बगीचे, धबधबे आणि  केबल कारची स्वारी मधून अप्रतिम पर्वत रांगा उतारावरील चहाच्या मळ्यांचा अद्भुत नजारा आणि बरंच  काही..... 
           Clock Tower
  • दार्जिलिंग हिमालयीन रेल्वे- टॉय ट्रेन                                                                                                   दार्जिलिंग हिमालयीन रेल्वे अर्थातच टॉय ट्रेनची सुरुवात १८८१ साली ब्रिटिशानीं केली. त्या काळात बैलगाडी, घोडेस्वारी याला पर्याय म्हणून टॉय ट्रेनची सुरुवात झाली. पूर्वी सिलिगुडी ते दार्जिलिंग असा हा नॅरो गेज मार्ग सध्या फक्त दार्जिलिंग शहरात कार्यरत आहे. येथे येणारा प्रत्येक पर्यटक याच्या प्रेमात पडल्या शिवाय रहात नाही. नागमोडी वळणे, छोटी शहरे  आणि सोबतच निसर्ग सौन्दर्याचा आनंद या ट्रेन मध्ये घेता येतो. 
Heart of Darjeeling- "Darjeeling Himalayan Railway/Toy Train
  • दार्जिलिंग चहा-                                                                                                                              दार्जिलिंग विषयी बोलणे हे चहाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. जगाच्या नकाश्यावर दार्जिलिंग हे चहा साठीच प्रसिद्ध आहे. 'चहा' हे असे एक उत्साहवर्धक पेय जे प्रत्येक भारतीयाच्या जीवनातील एक अविभाज्य भाग आहे. माझ्या भेटी दरम्यान अनेक चहाच्या मळ्यांना भेटी दिल्या आणि चहाचा मनमुराद आस्वाद घेतला. गुणवत्तेनुसार येथे चहाचे विविध प्रकार आढळतात. त्यांची किंमत साधारणपणे ७०० रु/किलो ते  ५०,००० रु/किलो आहे. 
World Famous Tea Garden
  • हवामान:                                                                                                                                         दार्जिलिंगला जाण्याचा सर्वोत्तम काळ कोणता? याचे उत्तर हे तुम्हाला काय आणि कशाचा आनंद घ्यायचा आहे यावर अवलंबून आहे. काही जण कांचनजंगाचे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी आणि उष्ण वातावरणातून बचाव करण्यासाठी उन्हाळ्यात दार्जिलिंगला येतात. तर काही बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी हिवाळ्यात येतात तर काही जण मान्सूनचा आनंद घेण्यासाठी पावसाळ्यात येतात. 
                                                      Snow Fall on 15th January 2017
  • ट्रेकिंग:                                                                                                                                          जर तुम्ही ट्रेकिंगचे शौकिन असाल आणि निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर दार्जिलिंग पर्वत रांगांमधील ट्रेकिंगचा आनंद जरूर घ्या. विविध पर्वत रांगांमधून, जंगलातून ट्रेकिंगचा मनमुराद आनंद घेता येतो.     
  • वाहतूक व दळणवळण-                                                                                                                  
१) विमानप्रवास: जवळचे विमानतळ- बागडोगरा (बागडोगरा- दार्जिलिंग ९४ किमी ३.५ तास)
२) रेल्वेप्रवास: जवळचे रेल्वे स्थानक- सिलिगुडी (SGUJ ), न्यु जलपाईगुडी (NJP)
३) सिलिगुडी हुन खाजगी वाहने देखील उपलब्ध आहेत. (सिलिगुडी- दार्जिलिंग ६५ किमी २ तास)                                                                                                                                                                                         शेवटी मला इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते कि तुम्ही जगात कुठेही असाल तरी एक वेळ अवश्य दार्जिलिंगला भेट द्या.





Thursday, 12 January 2017

।।जीवन करि जीवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म।।

शाकंभरी पौर्णिमा

नमोनमः।
पौष पौर्णिमा, श्रीशाकंभरी पौर्णिमा. अर्थातच भगवती शाकंभरीमातेचा अवतार दिवस  !!
शाक म्हणजे भाजीपाला व भरी म्हणजे भरण-पोषण करणारी. तिने स्वत:च्या देहातून अनेक भाज्या, धान्य इत्यादी खाद्यसामग्री निर्माण केली व पृथ्वीवरील जीवन अबाधित राखले. तेव्हापासून या तिथीला उपलब्ध सर्व भाज्या, फळे यांचा नैवेद्य दाखवून आई जगदंबेची पूजा केली जाते.प्रत्यक्ष जगदंबेच्या शरीरातूनच अन्नधान्य, भाजीपाला निर्माण झालेला आहे. म्हणजे अन्न हे तिचेच स्वरूप आहे. आपल्याकडे लहानपणापासून अन्नाचा आदर करण्याचे, त्याला पूर्णब्रह्म मानून सेवन करण्याचे संस्कार केले जातात, ते उगीच नाही  !!
आजच्या या पावन दिनी, ब्रह्मस्वरूप अशा अन्नाचे सुयोग्य महत्त्व मनावर ठसावे, यासाठी एक लेख पोस्ट करीत आहे.
                "अन्नं बहु कुर्वीत । अन्नं ब्रह्मेति व्यजानात् ।  अन्नं न निन्द्यात् ।" असा गौरवपूर्ण विचार मांडणारी  आमची ऋषीप्रणित भारतीय  संस्कृती  ! अन्नाला नावे ठेवू नयेत. अन्न भरपूर करावे, पात्रापात्र न पाहता सर्व गरजवंतांना अन्न द्यावे. अन्न ब्रह्मरूपच मानावे. एक शीत देखील वाया घालवू नये; असे आवर्जून बिंबवणारी आमची भारतीय संस्कृती काळाच्या उदरात गुडुप झालीये की काय? पौराणिक कथेत का होईना, पण एक तीळ सात जणांमध्ये वाटून खाण्याचा आदर्श वस्तुपाठ आमच्या मनावर उमटवणारी आमची संस्कृती श्रेष्ठ आहे, हे विसरून चालणार नाही !
                 जीवनरूपी ग्रंथाचे आद्य भाष्यकार, भगवान श्री ज्ञानदेवांची एक सुंदर श्रुती आहे. भगवद्गीतेचा शिष्ट संप्रदाय सांगताना ते अर्जुनाला म्हणतात,
धालिया दिव्यान्न सुवावें ।
मग जे वाया धाडावें ।    
तें आर्तीं कां न करावें ।
उदारपण ॥
॥ ज्ञाने.१८.६७.१९४३ ॥
                ज्याचे पोट भरलेले आहे त्यालाच पुन्हा प्रसादाचे दिव्य अन्न खाण्याचा आग्रह करावा आणि एक प्रकारे ते दिव्यान्न वाया घालवावे; यापेक्षा ज्याला गरज आहे, ज्याला अन्न मिळतच नाही किंवा जो दोनवेळच्या पोटभर जेवणाला मोताद आहे, त्याला का तुम्ही हे तुमचे उदारपण दाखवत नाही? माउलींच्या या प्रश्नाचे आपल्यापैकी कितीजण योग्य उत्तर देऊ शकतील?
                माझी एक कळकळीची विनंती आहे सर्वांना ! अन्नाचे महत्त्व वेळीच ओळखा व आपल्या मुला-बाळांनाही योग्य वयात ते महत्त्व असे बिंबवा की मरेपर्यंत कधीच विसरता कामा नये. कोणतेही अन्न हे भगवंतांच्या कृपेनेच समोर येते, त्याला नावे ठेवू नयेत. आवडीचे नसले तरी न कुरकुरता खावे. एकवेळ खाल्ले तर काही फरक पडत नाही. आई-वडिलांनी ही सवय स्वतःपासून सुरू करावी. मुले पाहून पाहून आत्मसात करतील. शिवाय आपल्या घासातला एक घास तरी गरजवंताला देण्याची उत्तम सवय लावून घ्यायला हवी. यथाशक्य द्यावे पण देत रहावे. देव भरभरून परतफेड करतातच त्याची !
                  जाता जाता एक फार महत्त्वाचा शास्त्रसिद्धांत सांगतो. संत वाङ्मयाचे थोर अभ्यासक, योगिराज श्री.मामासाहेब देशपांडे महाराज नेहमी सांगत की, "अन्नाचे एक शीत जरी आपल्या माजोरीपणाने किंवा हलगर्जीपणाने वाया घालवले तर त्या प्रत्येक शितासाठी एक आख्खा जन्म अन्नान्नदशेत काढावा लागतो, असे वेदवचनच आहे. म्हणून अन्नाचे महत्त्व ओळखा व चुकूनही कधी त्याची नासाडी होऊ देऊ नका !" हा सद्विचार पक्का ठसणे व त्यानुसारच वागणे, हीच खरी "अन्न सुरक्षा" आहे  !       
                  ही शाकंभरी पौर्णिमा, ब्रह्मरूप अन्नाच्या या भान-जाणीवेच्या स्निग्ध दीपाने उजळवून आपण सर्वजण जाणतेपणाने साजरी करूया व पुढील पिढ्यांसाठीही आदर्श घालून देऊया ! " जीवन करि जीवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म । उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ।।" अशी भाव-जागृती, सर्वांच्या अंतरात बोध-पौर्णिमा साजरी करीत बहरून येवो, हीच याप्रसंगी प्रार्थनापूर्वक शुभकामना !! आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
           
साभार:- लेखक रोहन उपळेकर यांच्या लेखाचा सारांश.

आठवणी शाळेच्या..!!!

               लिंबाचे लोणचे मुरले म्हणजे त्याला आंबट गोड रुचि येते! आयुष्यातल्या जुन्या आठवणीही अश्याच.... !!!               शाळेत रोज सक्...